राज्यांच्या सीमा सील, आकाशात लढाऊ विमानांची गस्त   

संभाव्य हल्ल्यांविरोधात हाय अलर्ट जारी!

मुंबई : पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमध्ये भारताने हवाई हल्ला केल्यानंतर भारतात सीमेलगत असलेल्या राज्यांना हायअलर्ट दिले आहेत. राजस्तान आणि पंजाब राज्य अलर्ट मोडवर असून पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. 

राजस्तान आणि पंजाबच्या सीमा बंद 

राजस्तानची एक हजार ३७ किमीची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. या राज्याची सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून संशयास्पद हालचाली आढळल्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना 'शूट अ‍ॅट साईट' तडख गोळी झाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भारतीय हवाई दलही सज्ज आहे. पश्चिम क्षेत्रातील आकाशात लढाऊ विमाने गस्त घालत असल्याने जोधपूर, किशनग्रह आणि बिकानेर विमानतळ ८ मेपर्यंत बंद ठेवले आहेत. तसंच, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.
 
सुखोई-३० एमकेआय जेट्स गंगानगर ते कच्छच्या रणपर्यंत हवाई गस्त घालत आहेत. बिकानेर, श्री गंगानगर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यातील शाळा बंद केल्या आहेत आणि सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीमावर्ती गावे हाय अलर्टवर आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दुसरीकडे स्थलांतर करण्याचीही योजना आखली आहे. सीमेजवळील ड्रोनविरोधी यंत्रणा देखील सक्रिय करण्यात आल्या आहेत. जैसलमेर आणि जोधपूरसाठी मध्यरात्री ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॅकआउट करण्याचे आदेश दिले आहेत. 'ब्लॅकआउट'मुळे हाय-स्पीड विमानांसाठी समस्या निर्माण होतात, ज्यामुळे शत्रूच्या वैमानिकांना हल्ला करणे कठीण होते.

पंजाबमध्येही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

पंजाबमध्येही सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील तणावामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.

Related Articles